श्रीनगर ः वृत्तसंस्था
भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांत भारतीय लष्कराने ही कारवाई केली. याच ठिकाणी मागील काही आठवड्यांपासून सुरू असणार्या चकमकींमध्ये नऊ भारतीय जवान शहीद झाले असल्याने ही कारवाई भारतासाठी मोठे यश मानले जात आहे. राजौरी सेक्टरमधील चकमकीत भारतीय लष्कराचे नऊ जवान शहीद झाल्यानंतर चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन राव यांनी रविवारी या भागाला भेट दिली होती. या वेळी त्यांनी या ठिकाणी नेतृत्व करणार्या भारतीय लष्करातील कमांडर्सच्या सध्या सुरू असणार्या कारवाईबद्दल चर्चा केली होती. मागील दोन ते तीन महिन्यांत राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांच्या सीमांवर असणार्या जंगलातून ‘लष्कर-ए-तोयबा’च्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती दिल्लीतील साऊथ ब्लॉकने दिली होती. यापैकी अनेकांचा सीमारेषेजवळच खात्मा करण्यात आला. त्यानंतरही कारवाई सुरू होती.