Breaking News

दिवाळीनंतर तीन मंत्री आणि तीन जावयांचे फटाके फोडणार; किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल

मुंबई ः प्रतिनिधी

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. या भ्रष्टाचाराबाबत दिवाळीनंतर सहा जणांचे फटाके फोडणार आहे. यात तीन मंत्री आणि तीन जावई असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. त्यांनी लवंगी फटाके फोडले. मी मात्र एकदम बॉम्ब फोडणार आहे, असाही दावा सोमय्यांनी केला आहे. ते मालड पूर्वमध्ये भाजपच्या दिंडोशीतील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना बोलत होते. किरीट सोमय्या म्हणाले, दिवाळी सण येतोय, दिवाळीत फटाके फोडतात. मी दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. एक, दोन, तीन, चार किंवा पाच नाही, तर पूर्ण अर्धा डझन लोकांचे फटाके फोडणार आहे. यात तीन मंत्र्यांच्या तीन घोटाळ्यांचा आणि त्यांच्या तीन जावयांचा समावेश आहे. सोमय्यांनी ठाकरे सरकारमध्ये जावयांचे राज्य आहे, अशीही टीका केली. ठाकरे सरकारला लाज वाटत नाही का? हिंदूहृदयसम्राटांचे नाव घेऊन मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी आमचा विश्वासघात केला. नरेंद्र मोदींशी, भाजपशी विश्वासघात करा, पण हिंदू धर्म संस्कृती आणि महाराष्ट्राशी विश्वासघात आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारादेखील सोमय्या यांनी या वेळी दिला.

भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र भ्रष्टाचारमुुक्त करू!

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांनी भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र करणार, अशी शपथ घेतली होती वाटते. जिथे पाहा तिथे घोटाळे. मराठी माणसाच्या अस्मितेचे नाव घेत यांनी वसुली सरकार निर्माण केले आहे, असा आरोप या वेळी सोमय्यांनी केला, तसेच यांनी भलेही महाराष्ट्राला भ्रष्टाचारयुक्त केले असेल, पण आम्ही तो भ्रष्टाचारमुक्त करू, असे म्हटले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply