मुंबई, अलिबाग ः प्रतिनिधी
गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रासह देशभरात कुठे दाट धुके, कुठे अवकाळी पाऊस, तर कुठे कडाक्याची थंडी पडत आहे. आता पाकिस्तानातून सुटलेले धुळीचे वादळ राज्यात धडकलेे. त्यामुळे दृष्यमानता कमी झाल्याचे जाणवले. पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे रविवारी (दि. 23) महाराष्ट्रात पोहचले. या वादळामुळे दृष्यमानता कमी झाली होती. कोकणासह राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस पडत असताना, दुसरीकडे मुंबई, पुण्यासह राज्याच्या काही भागात धुळीचे वादळ आल्याने धुलीकण हवेत पसरले. यामुळे समोरचे दिसणे कमी झाले. शिवाय अधूनमधून ढगही ये-जा करीत असल्याने सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणावर जमिनीवर पडत नव्हता. दुपारनंतर थंड वारे सुरू होऊन वातावरणात गारठा निर्माण झाल्याचे जाणवले. वाळवंटी परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यास तेथून धूळ उंचावर उडते आणि ही धूळ वार्यामध्ये मिसळते. त्यामुळे धुळीचे वादळ निर्माण होते. या वादळामुळे पुण्यासह मुंबईत धुलीकणांचे प्रमाण वाढल्याची नोंद भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) ‘सफर’ या संकेतस्थळावर झाली. दरम्यान, रायगड जिल्ह्यातही रविवारी सकाळपासून धुक्याप्रमाणे वातावरण झाले होते, तसेच हवेत गारठा पसरला होता. काही भागांत पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. धुलीकणांमुळे दृश्यमानता कमी झाल्याने वाहन चालविताना चालकांनी, तसेच श्वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.