पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने भव्य निबंध व वक्तृत्त्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल तथा अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
स्पर्धा तीन गटात घेतली जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांचे दोन गट आणि खुला गटात अकरावीपासून पुढील वयोगटातील नागरिकांना सहभाग घेता येईल. निबंध व वक्तृत्त्व स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल तसेच स्पर्धेत सहभाग घेणार्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. सर्व गटातील स्पर्धकांसाठी निबंध आणि वक्तृत्व् स्पर्धेचे विषय समान राहणार आहेत. खुल्या गटातील स्पर्धकांसाठी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे विषयपुढील प्रमाणे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीतील योगदान’ आणि ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : आधुनिक भारताचे निर्माते’.
गट क्रमांक दोन इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना निबंध आणि वक्तृत्वर स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत’ आणि ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचा मूलमंत्र – शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. गट क्रमांक तीन इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना निबंध आणि वक्तृत्व् स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास’ आणि ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अनुभव व आठवणी’.
या स्पर्धेसाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्या स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका पीर करमअली पनवेल मनपा शाळा क्र. 10 याठिकाणी कार्यालयात किर्ती महाजन आणि प्राजक्ता महाडिक यांच्याकडे द्याव्यात. निबंध स्पर्धेत सहभाग घेणार्या स्पर्धकांनी 12 एप्रिल 2022 पर्यंत सकाळी 10 वाजता पीर करमअली पनवेल मनपा शाळा क्र. 10 (पनवेल उर्दू शाळा), पनवेल महानगरपालिका मुख्यालयाच्या समोर, याठिकाणी निबंध स्पर्धेस यावे तसेच वक्तृत्व स्पर्धेतील स्पर्धकांची स्पर्धा याचठिकाणी या वेळीच घेण्यात येईल. या स्पर्धेचा निकाल 13 एप्रिल 2022 रोजी होणार असून
स्पर्धेचा बक्षिस समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे 14 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता होणार आहे.
स्पर्धेसंबंधित अधिक माहितीसाठी सुजित म्हात्रे (9220982310) आणि वैभव पाटील (9967912068) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेचे नियम व अटी
1) ही स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली राहील.
2) निबंध यापूर्वी कुठेही प्रसिध्द झालेला नसावा.
3) एका व्यक्तीस वरील गटानुसार एकाच विषयावर एकच निबंध लिहिण्याची अनुमती असेल.
4) निबंधाची शब्द मर्यादा कमीतकमी 500 शब्दांच्या वर असावी व भाषण हे कमीतकमी 3 मिनिटे असावे.
5) भाषणात/निबंधात वैध संदर्भअसणे अनिवार्य राहील.
6) निबंध/वक्तृत्त्व स्पर्धेमध्ये नाव नोंदणी व सहभाग घेण्यासाठी 11 एप्रिल 2021 हा अंतिम दिवस असेल.
7) निबंध स्पर्धेचा निकाल हा 11 एप्रिल 2021 रोजी जाहीर केला जाईल.
8) स्पर्धेच्या निकालाबाबतचे पूर्ण अधिकार आयोजकांकडे राखीव राहतील.
RamPrahar – The Panvel Daily Paper