
भंडारा : प्रतिनिधी
फोडा आणि तोडाचं राजकारण हा भूतकाळ झाला आहे. याचा ट्रेलर 2014ला पाहिला. आता या निवडणुकीत तुम्ही पूर्ण सिनेमा दाखवणार आहात. जो काम करणार त्यालाच तुमचा विश्वास मिळणार, हे आता सिद्ध झालं आहे, असा विश्वास मतदारांवर टाकत मोदींनी पुन्हा एकवार स्थिर सरकार निवडून देण्याचं आवाहन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौर्यावर आहेत. जळगावच्या सभेनंतर त्यांची भंडार्यात साकोळी येथे प्रचारसभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. मोदी म्हणाले, ‘मी महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासन दिले होते की तुम्ही आम्हाला संधी द्या आम्ही तुम्हाला स्थिर सरकार देऊ. देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या जनतेला स्थिर सरकार आणि सक्षम, युवा नेतृत्व लाभले आहे.’
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, सबका साथ सबका विकास हा मंत्र आम्ही देशाला दिला. आता या मंत्राला विश्वासही मिळाला आहे. आमची नीती आज जनकल्याणापासून राष्ट्रकल्याणाची आहे. जनअभियानापासून राष्ट्रनिर्माणापर्यंतची आहे. आज महाराष्ट्राच्या घराघरात शौचालय आहे. गरिबातल्या गरिबाचं घरही उजळून निघालं आहे. राज्यातल्या गरिबातल्या गरिब महिलेच्या स्वयंपाकघरातही एलपीजी गॅस आहे. गरिबातल्या गरिबाला चांगल्या रुग्णालयात आरोग्य सेवा मिळत आहे. देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे आता जितकं लक्ष दिलं जात आहे, तितकं आधी कधी दिलं गेलं नव्हतं. गावातल्या रस्स्त्यांवर आधीपेक्षा जास्त वेगाने रस्त्यांची कामे सुरू आहेत. येत्या काही वर्षांमध्ये गावांमध्ये पायभूत सुविधा आणण्यासाठी 25 लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, असे शेवटी पंतप्रधान मोदी म्हणाले.
RamPrahar – The Panvel Daily Paper