पारंपरिक पद्धतीने दणक्यात स्वागत
कोलकाता : वृत्तसंस्था
भारत आणि बांगलादेश या दोनही संघांसाठी पहिला दिवस-रात्र कसोटी सामना येत्या शुक्रवारपासून म्हणजेच 22 नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. हे सामने गुलाबी चेंडूने खेळावे लागतात. पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशला एक डाव आणि 130 धावांनी धूळ चारली. त्यानंतर दुसर्या कसोटीसाठी भारतीय संघ मंगळवारी (दि. 19) कोलकातामध्ये दाखल झाला. या वेळी भारतीय संघाचे पारंपरिक पद्धतीने दणक्यात स्वागत करण्यात आले.
भारत-बांगलादेश प्रकाशझोतातील ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी कोलकाता शहर गुलाबी रंगात न्हाऊन निघाले आहे. कोलकातातील रस्त्यांपासून ते हॉटेलपर्यंत सगळीकडे गुलाबी वातावरण पाहायला मिळत आहे. या सामन्याद्वारे बंगाल क्रिकेट असोसिएशन चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी गमावत नसून संघटनेच्या मुख्य कार्यालयावरसुद्धा गुलाबी छटा उमटली आहे.
कोलकाता कसोटीच्या पहिल्या चार दिवसांची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. जवळपास 68 हजार प्रेक्षकक्षमता असलेल्या ईडन गार्डनवरील या कसोटीसाठी चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे बांगलादेशने कडवी झुंज दिल्यास चाहत्यांना एका रोमहर्षक सामन्याचा अनुभव मिळू शकतो.
कसोटी मालिकेतील पहिला सामना लवकर संपला होता. त्यामुळे आधी भारतीय संघाने गुलाबी चेंडूने सराव केला. त्यानंतर मंगळवारी भारतीय संघ कोलकातामध्ये दाखल झाला.
RamPrahar – The Panvel Daily Paper