महाशिवरात्रीच्या कथांमध्ये व्याधाने म्हणजेच पारध्याने हरिणीवर नेम धरण्यासाठी ज्या झाडाची पाने तोडली ते बेलाचे झाड होते आणि झाडाखाली महादेवाची पिंड असते. हरिणीवर दया करून शेवटी शिकार न करताच पारधी परततो. त्याला उपवासही घडतो आणि पाने तोडताना ’ॐ नम: शिवाय’चा जपही घडतो आणि सोबतच त्याच्या हातून हरिणीची हत्या टळते, अशी पौराणिक कथा समाविष्ट असताना पूर्वीच्या दंडकारण्यात म्हणजे कोकणाचा काही भाग आणि सातारालगतचा भाग असलेल्या गावांमध्ये मात्र पौष पौर्णिमेनंतर देव पारधीला जात असल्याची भूतदयेपासून पळवाट दाखविणारी परंपरा प्रचलित आहे. या काळात शिकार करण्याच्या प्रयत्नात पोलादपूर तालुक्यातील चांभारगणी आड आदिवासीवाडीतील एका व्यक्तीचा सावजासाठी लावलेल्या इलेक्ट्रीक सापळ्यामध्ये शॉक लागून मृत्यू, तर दुसरा गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना दोन वर्षांपूर्वी झाली होती. वन्यजीवांच्या जीवावर बेतणारी आणि सदोष मनुष्यवधाचेही कारण ठरणारी ही अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी वारकरीबहुल पोलादपूर तालुक्यातील समाजधुरिणांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
येत्या पौष पौर्णिमेपासून म्हणजेच 10 जानेवारीपासून कोकणातील विशेषतः दंडकारण्यातील देव पारधीला निघालेत या जुन्या रूढीपरंपरेतून शिकार म्हणजेच पारध करण्याची परंपरा तत्कालीन दंडकारण्यात म्हणजे सध्याच्या महाड, पोलादपूर, महाबळेश्वर, जावळी, खेड, मंडणगड, दापोली अशा तालुक्यामध्ये पाहण्यास मिळते. या तालुक्यांच्या ग्रामीण भागामध्ये सध्या रानडुकरे, मोर, लांडोरी, रानकोंबडे, ससे, रानमांजर, साळींदर, भेकर अशा वन्यजीवांची सर्रास पारध करण्याचा प्रकार गावकी स्वरूपात सुरू झाला आहे. संतांच्या वचनांचा प्रभाव हरिनाम सप्ताहाच्या सांगतेनंतर अल्पावधीत संपून पौषाच्या पौर्णिमेनंतर संत महात्म्यांनी सांगितलेली प्राणिमात्रांबाबतची भूतदया मात्र परंपरांच्या अमानुषतेमध्ये कोठे गायब होते हे या वारकरीबहुल तालुक्यामध्ये समजूनही येत नाही. मुंबई बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर सिने अभिनेता संजय दत्तला महाड तालुक्यात रायगडनजीक शिकारीसाठी सशस्त्र आल्याच्या खबरीचा बेकायदेशीर हत्यार बाळगल्याच्या गुन्ह्याच्या प्रकरणात समावेश असल्याने तो अद्याप शिक्षा भोगत आहे. सलमान खान आणि अन्य सिनेतारकांवरील राजस्थानमधील वन्यजीवांच्या शिकारीचे प्रकरणही अद्याप चर्चेत आहे. त्याच धर्तीवर वन्यजीव संरक्षण कायद्याचे अज्ञान अथवा जुन्या अमानुष परंपरांचा पगडा ग्रामीण भागावर अद्याप कायम असल्याने शिकारीचा हा शौक आजही जोपासला गेला आहे. सहा वर्षांपूर्वी महाडच्या एसटी स्थानकामध्ये वाघाचे कातडे घेऊन जाणार्या तिघांना पकडले. ते पोलादपूर तालुक्यातील शिकारीतून मारलेल्या वाघाचे होते असे निदर्शनास आले होते. गेल्या दोन वर्षांपूर्वी असेच अन्य तिघेदेखील मुंबईनजीक वाघनखे व कातडे विकण्यास गेले असता पकडले गेले होते, मात्र याबाबत स्थानिक वनविभाग फारसे गांभीर्याने पाहत नाही.
चिकन आणि बोकडाचे मटण महाग झाल्याने फुकटच्या पारधीचा पर्याय स्वीकारणार्यांना कायद्यात अडकल्यावर हा पर्यायच अधिक महाग असल्याचे सलमान खान व अन्य बहुचर्चित प्रकरणांमुळे जाणवू शकणार असताना भेकराची पिल्ले बकरीच्या पिल्लांमध्ये चरून झाल्यानंतर सोबत आल्याचे निमित्त करून पाळली असल्याची तक्रार आल्यानंतर फणसाड अभयारण्यामध्ये सोडण्यापूर्वी तीनपैकी एक भेकराचे पिल्लू मरण पावले आणि त्याचे शवविच्छेदन करून पोलादपूरच्या पशुवैद्यकीय दवाखान्याबाहेरच्या मैदानात पुरण्यात आल्याचा खोटा दावा करण्यात आला होता.
वन्यजीवांच्या जीवावर उठणार्या या अनिष्ट प्रथेमुळे 2013मध्ये पोलादपूर तालुक्यातील चांभारगणी आड आदिवासीवाडीतील विठ्ठल पवार याचा सावजासाठी लावलेल्या इलेक्ट्रीक सापळ्यामध्ये शॉक लागून मृत्यू, तर दुसरा कृष्णा पवार हा गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे ’शिकार करने को आये, शिकार हो के चले।’ अशी चर्चा गावागावात सुरू झाली होती. सध्या देव पारधीला निघाले अशी प्रथा चालवताना देवाला कळे लावून शिकारीचा कौल घेण्याचीही प्रथा काही गावांत सुरू आहे. भातपिकाची कापणी झाल्यानंतर शेतातील पिकाचा बुंधा उकरून मुळांशी असलेला मऊ भाग खाण्यासाठी येणार्या रानडुकरांची पारध करणारे रानडुकरांच्या झुंडींची संख्या वाढणे शेतकर्याला हानिकारक असल्याचे सांगून गावकी पद्धतीने सामूहिक शिकार करण्यास सज्ज झाले आहेत. पोलादपूर तालुक्यासह आजूबाजूच्या परिसरामध्ये रब्बी हंगामात कोणतेही पीक घेतले नसताना शेतकर्यांच्या पिकाला हानिकारक असल्याचे सांगून रानडुकरांची शिकार करण्याची कागदोपत्री पूर्तता पंचनामे सरकार दरबारी तयार करून बिनधास्त शिकार करणार्यांची संख्या वाढली असून त्यांना कायद्याचा धाक बसण्याऐवजी कायद्याचाही शिकारीतील मांसाचा वाटा वेगळा केला जात असल्याचे दुर्दैवी चित्र पाहावयास मिळत आहे.
या अमानुष परंपरांच्या शौकिनांचे कायद्याच्या विरोधात वर्तन होत असल्याने ते या कायद्याविरोधात संस्कृती रक्षणाचे हत्यार उपसून या परंपरांतील अमानुषतेला प्रोत्साहन देऊ पाहत आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न करणार्यांना या शौकिनांकडून चिथावणी दिलेल्या लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, तर या अनिष्ट प्रथांबाबत जनतेचे प्रबोधन करण्याच्या प्रयत्नांनाही हाच अनुभव घ्यावा लागत असल्याने कायद्याची व्यापक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता निर्माण होण्यासोबतच विविध आध्यात्मिक सांप्रदायांतील प्रमुखांनी या अमानुष परंपरांविरोधात ग्रामीण जनतेचे प्रबोधन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
-शैलेश पालकर
RamPrahar – The Panvel Daily Paper