

वटपौर्णिमा हा सण स्त्रीयांसाठी फक्त उपवासाचा दिवस नव्हे, तर हिंदू पतिव्रतेच्या ह्दयात अढळ स्थान असलेल्या सावित्रीच्या तत्त्वज्ञान, दृढनिश्चय, सुशिलता, त्याग, सदाचार, शालीनता, पतिव्रता या गुणांची स्वामिनी असलेल्या गुणवती कुळवती लावण्यवती सावित्रीकडून शिकवण व अखंड आयुष्यभरासाठी प्रेरणा घेण्याचा दिवस म्हणजे वटपौर्णिमा आज तसा जास्तच उशीर झाला होता. रस्त्यावर एका ठिकाणी बायकांची खूप गर्दी होती. बघतो तर फणसांचा ढीग पडला होता आणि बायका खरेदी करायला जणू तुटून पडल्या होत्या. आमच्या सावित्रीने गेल्या आठवड्यात तशी तंंबीच दिली होती की रविवारी थोडी सुटी काढून घरी या, वटपौर्णिमा आहे, तर या वटपौर्णिमेचा सण म्हणजे सत्यवान सावित्रीविषयी सर्वांना माहीतच आहे.
अश्वपती नावाच्या राजाला मूलबाळ नव्हते. तो निपुत्रिक होता. त्याने तप करून सूर्याला प्रसन्न केले. पुत्रवंत होण्याचा वर मागितला. सूर्याने पुत्री होईल, असा आशीर्वाद दिला, पण आजच्या माणसांप्रमाणे त्याने हट्ट नाही केला की मला मुलगाच पाहिजे म्हणून. सूर्याच्या वरामुळे राजाला मुलगी झाली म्हणून नाव सावित्री. सावित्री खूप हुशार, गुणी आणि सर्व उपनिषदांत निपुण होती. त्याला आपल्या मुलीवर पूर्ण विश्वास होता. म्हणूनच राजाने तिला तिच्या मनासारखा पती निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. तिने कित्येक राजकुमारांतून द्युमत्सेन राजाचा मुलगा सत्यवानाची निवड केली, पण त्याच वेळी सत्यवानाचे वडील राजा द्युमत्सेनाचे काही कारणाने राजवैभव गेले आणि दोन्ही राजा-राणी अंध झाले, पण तिने आपला निर्णय बदलला नाही. स्वतः नारदाने तिला समजावले की सावित्री हा सत्यवान कितीही चांगला गुणवान असला तरी त्याचे आयुष्य फक्त एक वर्षेच आहे, पण तिने सांगितले जे व्हायचे होते ते झाले. आता काही बदल होणार नाही. हिंदू संस्कृतीनुसार एकदा कुणाला पती म्हणून वरले मग दुसर्याचा विचारही करणे व्याभिचार. तर असी ही सावित्री अटल, अढळ, सुलक्षणी पतीव्रता स्त्री होती.
लग्नानंतर राजवैभव गेल्यामुळे अगदी कैवल्य नेसून पतीसोबत अरण्यात सुखाने राहायला गेली, पण आज-कालच्या मुलींप्रमाणे विचारही केला नाही की मी माहेरी किती वैभवात होते. पालापाचोळ्यांच्या पर्णकुटीत तिने स्वर्ग अनुभवला. पती हाच परमेश्वर हाच सिद्धांत. सत्यवानाच्या अंतकाळाचा दिवस एकेक करून जवळ येत होता आणि तो काळ दिवस उजाडला. नित्य दिनाप्रमाणे अग्निहोत्रासाठी सुकी लाकडे आणायला जंगलात निघाला, पण आज सावित्रीने पतीसोबत जाण्याची सासू-सासर्यांकडे याचना केली. त्यांच्या परवानगीने ती जंगलात गेली. एका झाडावरील सुके लाकूड काढताना त्याला भोवळ आली. तो कसाबसा खाली उतरला. सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून निपचित पडला. सावित्री आपल्या पदराने त्याला वारा घालू लागली. इतक्यात तिच्यासमोर तेजस्वी कांतीचा रंगाने काळा महाभयंकर देवपुरुष हातात फाशीचा दोर घेऊन रेड्यावर स्वार असा प्रकट झाला. त्याच्या फासाच्या एका टोकाला सत्यवानाच्या पायाचा अंगठा अडकवून नेऊ पाहत होता. सावित्रीने न डगमगता प्रश्न केला, हे देवा आपण कोण आहात आणि माझ्या पतीला आपण कुठे घेऊन निघालात? यम म्हणाला, हे सावित्री मी काळदेव यमराज. तुझ्या पतीचा जीवनकाळ संपला आहे. तुझ्या चारित्र्यशील तेजासमोर माझे यमदूत येऊ शकत नाहीत म्हणून मलाच स्वतः यावे लागले. इतके बोलून यमराज सत्यवानाचे प्राण हरण करून दक्षिणेकडे निघाले, पण सावित्रीने त्यांची पाठ सोडली नाही. यमाने तिला खूप समजावले, पण व्यर्थ. त्याने सांगितले पतीचे प्राण सोडून काहीही माग. तिने आपल्या सासू-सासर्याचे गेलेले वैभव आणि डोळे मागितले. यमाने हे सर्व देऊनसुद्धा तिने यमाची पाठ सोडली नाही. मग अजून काय माग म्हटल्यावर तिने आपल्या पित्याला पुत्रप्राप्तीचा वर मागितला. ते देऊनसुद्धा ती थांबली नाही. तेव्हा हताशपणे यम म्हणाले, शेवटचा वर माग. तेव्हा सावित्री म्हणाली, देवा दोन्ही कुळांसाठी मी मागितले. आता माझ्यासाठी पुत्रवतीचा वर द्यावा. यम घाईघाईने तथास्तु म्हणून पुढे जाऊ लागले, पण चार पावले चालून तिथेच थबकले. त्यांची चूक त्यांना कळली. पतिव्रता सावित्रीला पतीशिवाय मुले कशी होतील? ते तिच्या चातुर्यावर प्रसन्न झाले आणि सत्यवानाला 400 वर्षे आयुष्य व 100 पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला. तो दिवस पौर्णिमेचा होता आणि ते झाड वडाचे. म्हणून स्त्रीया या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा उपवास करतात.
भगिनींनो, आपले अस्तित्व ओळखा. तुम्ही या भारतभूमीच्या पुत्री आहात. या मातीतून अनेक असामान्य शक्ती जन्माला आल्यात. वीरमाता जिजाबाई, वीरांगणा राणी लक्ष्मीबाई, पतिव्रता सावित्री, सत्त्वशील अनूसया, त्यागमूर्ती सीता, नावे घेऊ तितकी कमी आहेत. नारी कधीच अबला नव्हती. समाजातील कोणतीही ताकद तिला कमजोर करू शकत नाही. तिला एकच गोष्ट कमजोर करू शकते ते तिचे आत्मबल. ते आत्मबल खचवू नका. फक्त योग्य आचरण करा आणि त्या शक्तींचा आदर्श समोर ठेवा.
ज्या मायबहिणी या वटपौर्णिमेचा उपवास करणार आहेत, त्यांना माझे इतकेच सांगणे आहे की, जर तुम्ही तिचा उपवास करता तर तिच्याप्रमाणे आचरण करा. सावित्रीने राजवैभव गेल्यानंतरही झोपडीत राहून आपल्या अंध सासू-सासर्यांची सेवा केली. आजकालच्या सुनांप्रमाणे पतीला त्याच्या आई-वडिलांपासून अलग केले नाही. सावित्रीने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर पतीचे गेलेले प्राण आणले, पण आपण प्राण नाही मात्र आपल्या चारित्र्याचे रक्षण जरूर करू शकता. तुम्ही कुळाची मानमर्यादा, सासरच्या लोकांचा मानसन्मान आणि नवर्याची मर्यादा राखली तर तो खरा उपवास ठरेल. तर अशी होती पतिव्रता सावित्री. तिने दोन्ही कुळांचा उद्धार केला. त्याचे श्रेय जाते ते तिच्या पित्याला. त्याने मुलगाच पाहिजे असा विचार केला असता, तर सावित्री जन्मलीच नसती, पण आजकाल कित्येक सावित्र्या पोटातच मारल्या जातात. कुळाचा उद्धार करण्यासाठी मुलगाच होणे जरुरी नाही. आपल्या मुलीला सावित्रीसारखे आचरण तसेच चांगले संस्कार द्या. म्हणूनच म्हणतात, मुलगी शिकली, प्रगती झाली.
-अजय शिवकर, केळवणे, पनवेल