’चांद्रयान-2’ झेपावलं ; भारताची ऐतिहासिक कामगिरी
श्रीहरिकोटा : वृत्तसंस्था
जगभरातील सर्वच भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेले आणि अवघ्या जगाचे लक्ष लागलेले ’चांद्रयान-2’ सोमवारी (दि. 22) अखेर अंतराळात झेपावले. इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी ’चांद्रयान-2’चे प्रक्षेपण करण्यात आले. यान यशस्वीपणे अवकाशात झेपावल्यानंतर शास्त्रज्ञांसह देशवासीयांनी एकच जल्लोष केला.
’अशी’ असेल मोहीम
पृथ्वी आणि चंद्रादरम्यानचे अंतर तीन लाख 84 हजार किलोमीटर इतके आहे. चांद्रयान-2द्वारे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्रापर्यंत जातील. चंद्राच्या भूमीवर उतरण्यापूर्वी रोव्हर ’विक्रम’ उतरण्याच्या जागेची पाहणी करणे सुरू करेल. त्यानंतर लँडर यानापासून डिबूस्ट होईल. त्यानंतर विक्रम चंद्राच्या भूमीच्या अगदी जवळ पोहचेल. जिथे उतरायचे आहे त्या जागेचे स्कॅनिंग सुरू होईल. त्यानंतर 6 ते 7 सप्टेंबरदरम्यान लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल. लँडिंगनंतर लँडर विक्रमचा दरवाजा उघडेल. त्यानंतर रोव्हर प्रज्ञान बाहेर येईल. रोव्हर बाहेर येण्यासाठी सुमारे चार तास लागतील. त्यानंतर तो वैज्ञानिक परीक्षणांसाठी चंद्राच्या भूमीवर चालू लागेल. नंतर पुढील 15 मिनिटांच्या आत इस्रोला लँडिंगचे फोटो मिळणे सुरू होईल.
RamPrahar – The Panvel Daily Paper