
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पावसाळ्यात वर्षासहलीसाठी कर्नाळा अभयारण्याला पर्यटकांकडून नेहमीच पसंती दिली जाते. सुटीच्या दिवशी तर या ठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल होत असतात, मात्र रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे कर्नाळा अभयारण्यात भूस्खलन झाले असून विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे या ठिकाणी 9 ऑगस्टपर्यंत पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. रायगडसह पनवेल तालुक्यात सतत पडणार्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन, तसेच रस्त्यांवर झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. याचा परिणाम कर्नाळा अभयारण्यावरही पाहायला मिळाला. येथे अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले असून, विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे कर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायवाटेसाठीही अडथळा निर्माण झाला आहे. येथील प्रसिद्ध मयूर बंधारा पूर्णपणे मातीने भरला आहे. सर्व परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी दोन-तीन दिवसांचा कालावधी लागणार असल्यामुळे 9 ऑगस्टपर्यंत पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper