टोल वाचविण्यासाठी जुन्या हायवेवरून प्रवास
खोपोली ः प्रतिनिधी
मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (दि. 4) खासगी बसच्या अपघाताला बसचालक बद्रिनाथ पोपट गोसावी हाच जबाबदार असून, टोलचे 270 रुपये वाचविण्यासाठी मारलेला शॉर्टकट पाच जणांचे बळी आणि 40 जणांना जखमी करणारा ठरला. सोमवारी पहाटे खासगी बस (क्रमांक एमएच-04-एफके-1599) कराडहून मुंबईच्या दिशेने 49 प्रवासी घेऊन निघाली होती. बसचा प्रवास बोरघाट सोडल्यानंतर गारमाळजवळ झालेल्या अपघाताने संपला. गारमाळनजीक वळणावर बसचालक बद्रिनाथचे नियंत्रण सुटल्याने बस रस्ता सोडून 20 फूट खाली कोसळली. बसची आसने एकमेकांवर चेपली जाऊन पाच जण ठार, तर 40 जण जखमी झाले. खंडाळा सोडल्यानंतर खालापूर टोलनाका येथील टोल वाचविण्यासाठी अनेक मोठी वाहने खोपोली बाह्यमार्गाचा पर्याय निवडतात. तीव्र उताराचा आणि वळणावळणाचा रस्ता धोकादायक असल्याने केवळ हलकी वाहने या मार्गाचा वापर करतात. रात्रीच्या वेळेस मोठी वाहने अगदी पहाटेपर्यंत या मार्गाचा वापर बिनधोक करतात.
RamPrahar – The Panvel Daily Paper