Breaking News

मुंबईचा दिल्लीवर शानदार विजय

इंदूर : वृत्तसंस्था

मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अव्वल साखळीत दिल्लीवर आठ गडी राखून विजय मिळवला. पहिल्या सामन्यात कर्नाटककडून पराभव पत्करणार्‍या दिल्लीविरुद्ध तुषार देशपांडेची भेदक गोलंदाजी आणि श्रेयस अय्यरची नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर स्पर्धेतील पहिला विजय नोंदवत चार गुणांची कमाई केली.

नाणेफेक गमावल्यानंतर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 7 बाद 144 धावा धावफलकावर लावल्या. दिल्लीकडून उन्मुक्त चंद (22) आणि ध्रुव शौरी (33) यांनी दुसर्‍या गड्यासाठी 58 धावांची भागीदारी केली. मग ललित यादव (33) आणि हिंमत सिंग (24) यांनी पाचव्या गड्यासाठी 56 धावांची भागीदारी केली. मुंबईच्या तुषारने चार षटकांत 19 धावांत चार फलंदाजांना बाद केल्यामुळे दिल्लीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

दिल्लीचे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेला मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉ (3) याने निराशा केली, परंतु जय बिस्ता (39) आणि श्रेयस अय्यर यांनी दुसर्‍या गड्यासाठी 57 धावांची भागीदारी रचली. बिस्ता बाद झाल्यावर श्रेयसने सूर्यकुमार यादव (26 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 42) सोबत तिसर्‍या गड्यासाठी नाबाद 76 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. श्रेयसने 47 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह नाबाद 53 धावा करून संघाला विजय मिळवून दिला.

Check Also

कबड्डी महाराष्ट्राचा श्वास, तर रायगड जिल्हा कबड्डीपटूंची खाण -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राच्या मातीत रूजलेली कबड्डी राज्याचा श्वास असून रायगड जिल्हा कबड्डीपटूंची खाण आहे, …

Leave a Reply