मुंबई : प्रतिनिधी
नवीन वर्षात ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघाविरुद्ध पहिला वन-डे सामना खेळणारा भारतीय संघ 255 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताकडून सलामीवीर शिखर धवनने 74, तर लोकेश राहुलने 47 धावांची खेळी करीत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारतीय धावगतीवर अंकुश लावला. भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या 10 धावा काढून माघारी परतला. यानंतर शिखर धवन आणि लोकेश राहुलने दुसर्या विकेटसाठी शतकी भागीदारी करीत संघाचा डाव सावरला. यादरम्यान शिखर धवनने आपले अर्धशतकही पूर्ण केले. लोकेश राहुल अर्धशतकापासून अवघ्या 3 धावा दूर असताना बाद झाला आणि भारताची जोडी फुटली. यानंतर भारतीय फलंदाजांनी निराशाजनक खेळी केली.
शिखर धवन 74 धावांची खेळी करून माघारी परतल्यानंतर एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. सर्व फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिल्यामुळे मोक्याच्या षटकांमध्ये भारत धावसंख्या वाढवू शकला नाही. तळातल्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने 255 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 3, पॅट कमिन्स आणि रिचर्डसनने प्रत्येकी 2, तर झॅम्पा-आगरने 1-1 बळी घेतला.
Check Also
आदई डोंगरावर वृक्षारोपण अभियान
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तपर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आदई डोंगरावर …
RamPrahar – The Panvel Daily Paper