Breaking News

मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा

दरे कुटूंबियांचा समाजापुढे आदर्श

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्याती नितळस गावात रविवारी (दि. 29)  एक विवाह सोहळा झाला. दारात मंडप नाही, वर्हाडी ही नाही,  वाजंत्री नाही की नाजुक साजुक करवल्या नाहीत. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन असल्याने घरातील फक्त काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा करून पाटील आणि दरे कुटूंबियांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला. चिंध्रण गावचा सचिन शिवाजी पाटील आणि नितळस गावची काजल गणपत दरे यांचा लग्न सोहळा 29 मार्च रोजी पार पडणार होता. लग्नाच्या पत्रिका वाटून आवश्यक ती खरेदी देखील करण्यात आली होती. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन असल्याने दोन्ही बाजूच्या मंडळींनी हे लग्न घरच्या काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत उरकण्याचा निर्णय घेतला. धवलारीण व भटजी यांच्या उपस्थितीत आवश्यक ते विधी उरकण्यात आले. फक्त घरातील त्याही काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत वधूच्या गावात अर्थात नितळस या ठिकाणी हे लग्न पार पाडण्यात आले. या वेळी वाजंत्री, वराडी, भले मोठे मंडप डेकोरेश असे काही नव्हतेच, इतकंच काय लग्नासाठी हार देखील साध्या झेंडुच्या फुलांचे आणि घरातच बनवून घेतलेले होते. लग्न म्हटले की प्रत्येक तरुण-तरुणीचे एक स्वप्न असते. त्यात आगरी समाजातील लग्न आणि हळद अतिशय धुमधडाक्यात साजरी केली जातात हे सर्वश्रुत आहे. एकीकडे शहरातील सुशिक्षित म्हणून संबोधण्यात येणार्‍या लोकांना घरात राहण्यासाठी आजही प्रशासनाला जोर जबरदस्ती करावी लागत असतांना ग्रामीण भागातील कुटुंबाने आयुष्यात एकदाच होणारा लग्नाचा सोहळा देखील शासनाच्या आदेशामुळे सध्या पद्धतीने केला हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply