माणगाव ः प्रतिनिधी – जगभरात कोरोनाने हैदोस घातला असून यामुळे अनेक गावांतील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती ओढवलेल्या माणगाव तालुक्यातील वारक आदिवासी वाडीतील 100 कुटुंबांना भाजप तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी जीवनावश्यक वस्तू म्हणजेच अन्नधान्याचे वाटप करून दिलासा दिला आहे.
सध्या जगभरात कोरोना महामारी पसरली आहे. त्यामुळे जनतेचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी 14 एप्रिलपर्यंत केंद्र सरकारने लॉकडाऊन जारी केले आहे. या पार्श्वभूमीवर रोजंदारीवर काम करणार्या अनेकांची पुरती तारांबळ उडाली आहे. असेच संकट ओढवलेल्या माणगाव तालुक्यातील वारक आदिवासी वाडीतील 100 कुटुंबांना माणगाव भाजप तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी अन्नधान्यरूपाने मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जपली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही गर्दी करू नका. कामाव्यतिरिक्त कोणी घराबाहेर पडू नका. आपले हात काही वेळाच्या अंतराने स्वच्छ धुवा, असे आवाहन संजयआप्पा ढवळे यांनी केले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार पुरेपूर प्रयत्न करीत असून त्याकरिता जनतेने आलेल्या आणीबाणीच्या काळात सरकार व प्रशासनाला सहकार्य करावे. माणगाव तालुक्यातील तमाम नागरिकांनी कोरोनाला डोके वर न काढू देण्यासाठी सरकारच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. तरच माणगाव तालुका कोरोनामुक्त राहील, असा विश्वासही संजयआप्पा ढवळे यांनी व्यक्त केला.
RamPrahar – The Panvel Daily Paper