संजयआप्पा ढवळे यांची मागणी

माणगाव ः प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय टप्प्याटप्प्याने घेतला. लॉकडाऊन काळात मुंबई, पुणे अथवा अन्य शहरांतून येणार्या कोकणवासीयांसाठी शासनाने केलेल्या सुविधा अपुर्या पडत असल्याने अनेक जण कोकणात आपल्या गावी आजही चालत येताना दिसत आहेत. असेच पायी चालत येताना रायगड जिल्ह्यातील तिघांचा गावी पोहचण्याआधीच मृत्यू आला आहे. या मृतांच्या नातेवाइकांना राज्य शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत करावी, अशी मागणी माणगाव भाजप तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आज कोरोनाने संपूर्ण जगात हैदोस घातला आहे. लाखोंच्या संख्येने लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला असून अनेकांना याची लागण होऊन ते विविध कोविड 19 रुग्णालयांतून औषधोपचार घेत आहेत. या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहून केंद्र सरकारने देशवासीयांचे हित पाहून त्यांची या विषाणूपासून मुक्तता होण्यासाठी देश लॉकडाऊन करून सर्वांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर न पडता घरातच राहावे, सुरक्षित राहावे, असा संदेश देशवासीयांना दिला. लॉकडाऊन काळात राज्य सरकारने कोकणात येणार्या कोकणवासीयांसाठी केलेल्या सुविधा अपुर्या पडल्याने कोकणातील लोकांनी पायी चालत येण्याचा निर्णय घेतला.
यादरम्यान रायगड जिल्ह्यातील तिघांचा पायी चालत येताना मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने आर्थिक मदत करून आधार द्यावा, अशी मागणी माणगाव भाजप तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.