Breaking News

कोरोना : गणेशोत्सव आणि लोकमान्य टिळक

स्वराज्याचे प्रणेते म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिलेल्या अनेक घोषणा भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रेरणा ठरल्या. टिळकांनी अहमदनगरमध्ये भर पावसात एका सभेत उच्चारलेल्या स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या वाक्याने देशवासीयांच्या मनात स्वातंत्र्याची मशाल पेटवली आणि ती मशाल पुढे सलग 31 वर्षे तशीच पेटत राहीली. भारतीयांना देशप्रेम व स्वातंत्र्याची गरज याची जाणीव करून देणार्‍या या टिळकांची आज 164 वी जयंती आहे. त्यांना अभिवादन.

आज जगात सर्वत्र कोरोना पसरलेला आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने विविध उपाय योजना केल्या आणि त्यात यशही मिळते आहे. कोरोनासंसर्ग त्यासाठी केलेल्या उपायोजना, लॉकडाऊन, जमावबंदी या अशा सध्याच्या परिस्थितीत महापुरुष, नेते, संत, स्वातंत्र्यवीर या सर्वांच्या जयंत्या सार्वजनिक ठिकाणी जल्लोषात साजर्‍या करणे आता शक्य नाही. शासनाचे आदेश पाळून साधेपणाने सण, उत्सव साजरा करुया.

बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक यांचा इतिहास सगळयांनाच परिचयाचा आहे. परंतु आज या लेखात टिळकांच्या संबंधित काही महत्त्वाच्या आणि आजच्या परिस्थितीशी संबंधित अशा गोष्टींचा आढावा घेऊ.

1897 साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची (र्इीलेपळल झश्ररर्सीश) साथ आली होती. कौटुंबिक स्तरावर 1902-03 साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथही प्लेगला बळी पडला. बाळ गंगाधर टिळक यांनी मराठी पत्रकारितेत मोठे योगदान दिले. तथापि, त्यांनी या प्लेगच्या साथीच्या काळात घेतलेली भूमिका महत्वपूर्ण ठरली. उंदीर नष्ट करण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुण्यात फवारणी मोहीम सुरू केली तेव्हा, पुणेकरांनी विरोध केला. हा विरोध मोडून काढण्यासाठी पुण्याचा ब्रिटिश रेसिडेंट वॉल्टर चार्ल्स रँड याने लष्कराची मदत घेतली. व त्यांचे जवान पुण्यात आरोग्य विभागाच्या मदतीला आले, घरात घुसून जबरदस्तीने फवारणी करु लागले. साथीचा फैलाव झाल्याचे कारण सांगून लोकांचे सामान, कपडे-लत्ते सर्रास जाळून टाकू लागले, यामुळे पुण्यात एकच हाहाकार उडाला. रँडसाहेब मुद्दाम आमची घरे जाळीत आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. टिळकांनी केसरीमधून या भूमिकेला उचलून धरले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? हा टिळकांचा अग्रलेख याच संदर्भातील आहे. टिळक लिहितात :रँडसाहेबांच्या फवारणीचा मोर्चा आता आमच्या घरात-माजघरात पोहोचला आहे. रँडसाहेबांचे लाडके सोल्जर पायातल्या खेटरांसकट फवारणीचे धोटे घेऊन आमच्या घरात घुसतात. घरातले सामान रस्त्यावर फेकून देतात, जाळून टाकतात, आमच्या देवघरात घुसून उंदरांबरोबर आमच्या विघ्नहर्त्या गणेशावरही फवारणी करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे.

त्याकाळात साथीच्या रोगासाठी फवारणी मागचा इंग्रजांचा  मनसुबा वेगळा होता. त्यामुळे टिळकांनी त्या गोष्टीला विरोध दर्शवीला होता. परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे. आजचे सरकार जनतेच्या हितासाठी, आरोग्यासाठी व संरक्षणासाठी

सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. आजच्या परिस्थितीत शासनाने दिलेल्या आदेशांचे व मार्गदर्शनांचे जनतेने पालन केले तर हा कोरोनाविरोधाचा लढा आपण लवकरच जिंकू.

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात, जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. सन 1893 मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. घराघरांत साजरा होणार्‍या गणपती उत्सवाला टिळकांनी एका दहा दिवस चालणार्‍या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले. या उत्सवाच्या निमित्ताने जनता एकवटेल, लोक एकत्र येतील, त्यांच्यात एकतेची भावना निर्माण होईल. एकत्र आल्याने सांस्कृतिक आणि बौद्धिक कार्यक्रमांच्या रुपाने त्यांच्यात जनजागृती निर्माण करता येईल. अशी भावना लोकमान्य टिळकांच्या मनात होती सर्व भारतीय लोकांनी आपसातले भेद सोडून एकत्र यावे ही लोकमान्य टिळकांची

मुख्य इच्छा होती.

यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करावा, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांना केले आहे.  पुणे तसेच इतर बर्‍याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे. तसेच शासन जो निर्णय घेईल त्यास पूर्णपणे पाठिंबा आहे, अशी ग्वाही राज्यातील गणेश मंडळांनी दिली आहे. कोरोनाचा धोका संपलेला नाही, गर्दी करता येणार नाही, मिरवणूका काढता येणार नाहीत. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता, योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल. ही साधेपणाची चौकट आपणा सर्वांना ठरवावी लागेल. महाराष्ट्रात पुनश्च हरिओम करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल हे सावधतेने टाकणे गरजेचे आहे. त्यामुळे हा उत्सव साजरा करताना देखील आपल्याला चौकटीत राहून उत्सव साजरा करावा लागेल. अशा पद्धतीने सावधगिरीने व पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला तरच लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना खर्‍याअर्थाने आदरांजली वाहिली जाईल.

– प्रवीण डोंगरदिवे, माहिती सहाय्यक, विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply