नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी (दि. 25) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. या मागणीचे निवेदन आठवले यांनी राष्ट्रपतींना दिले. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेली स्फोटकांची गाडी, सचिन वाझे प्रकरण, त्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप, महिन्याला 100 कोटींची हफ्ता वसुली यासारख्या प्रकारामुळे महाराष्ट्राच्या गृह विभागाची प्रतिमा डागाळली आहे, असे सांगून आठवले म्हणाले की, राज्यातील जनतेत भीतीचे वातावरण आहे. तीन पक्षांचे राज्य सरकार निर्णय घेण्यात कमालीचे उदासीन असून राज्याचा विकास खुंटला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राज्य सरकार त्वरित बरखास्त करून येथे राष्ट्रपती राजवट लागू करावी.