मुंबई ः प्रतिनिधी
ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. या माहितीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी राऊत यांच्यावर टीका केली. पात्रा यांच्यानंतर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही राऊतांना सवाल केला आहे. ‘ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाले नाहीत असे उत्तर दिल्याने केंद्रावर खटला भरावा, असे संजय राऊत यांचे म्हणणे आहे. मग महाराष्ट्र सरकारने मे महिन्यात उच्च न्यायालयात ऑक्सिजनअभावी राज्यात एकही मृत्यू झाला नाही, असे प्रतिज्ञापत्र दिलेय. मग राज्य सरकारवरही राऊतजी खटला भरणार आहेत का?,’ असा सवाल चित्रा वाघ यांनी ट्विटरवरून केला आहे. दरम्यान, ऑक्सिजनअभावी एकही रुग्ण दगावला नसल्याची केंद्राची माहिती ऐकून आपल्याला धक्का बसल्याचे संजय राऊत यांनी म्हटल्यानंतर आता अतुल भातखळकर यांनी त्यावर टीका करीत खोचक सल्ला दिला आहे. ‘मे महिन्यात ठाकरे सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले होते की राज्यात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही. केंद्राचे अहवाल राज्याने दिलेल्या माहितीच्या आधारेच बनतात. केंद्राने ठाकरे सरकारच्या माहितीच्या आधारे तसाच अहवाल बनवला. या अहवालाचा म्हणे संजय राऊत यांना धक्का बसला,’ असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. दरम्यान, या आकडेवारीनंतर केंद्र सरकारवर खटला दाखल करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे. त्यावरूनदेखील अतुल भातखळकर यांनी राऊतांना सुनावले आहे. ‘अहो संजय राऊत, निर्लज्जपणालाही मर्यादा असतात. ठाकरे सरकारने न्यायालयात केलेले खोटे दावे लक्षात राहत नसतील तर लिहून ठेवत जा. मग असे धक्के बसणार नाहीत. राऊत आता लोकांना केंद्र सरकारविरुद्ध केस दाखल करायला सांगत आहेत. मग आता तोच न्याय स्वत:लाही लावा,’ असे भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.