मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल सोमवारी (दि. 3) जाहीर होणार आहे. कोरोनामुळे यंदा ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील सर्व मंडळांना बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करण्याचा आदेश दिला होता. मात्र राज्य मंडळाला ही मुदत पाळता आली नव्हती. गेला महिनाभर राज्यात पडलेल्या पावसाचा, पूरपरिस्थितीचा फटका बारावीच्या निकाल प्रक्रियेला बसला. पाऊस आणि पुरामुळे काही शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांकडून निकाल प्रक्रियेसाठी मुदतवाढ मागितली गेल्याने अंतिम टप्प्यात असलेली निकालाची प्रक्रिया काहीशी लांबली होती. अखेर सोमवारी निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाची उत्सुकता होती. जुलैअखेर इयत्ता बारावी निकाल लागेल असे म्हटले गेले होते, पण दिलेली मुदत निघून गेली. अखेर सोमवारी दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper