Breaking News

पुलांचे संरक्षक कठडे गेले वाहून

पाली, जांभूळपाडा येथील पूल बनले धोकादायक

पाली : प्रतिनिधी

अंबा नदीला आलेल्या पुरामध्ये खोपोली-वाकण मार्गावरील पाली व जांभूळपाडा पुलांचे सिमेंट व लोखंडी संरक्षक कठडे (रेलिंग) वाहून गेले. त्यामुळे हे पूल वाहतुकीसाठी असुरक्षित झाले आहेत.

अंबा नदीवरील हे पूल मुंबई-गोवा आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गांना जोडतात. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी व अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे अंबा नदीला पूर आला होता. त्यात पाली व जांभूळपाडा पुलांचे लोखंडी रेलिंग व सिमेंटचे कठडे तुटले. अतिवृष्टीमुळे या पुलांजवळ ठिकठिकाणी  खड्डेसुद्धा पडले आहेत. पुलांवर वाहून येवून साठलेला राडारोडा यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने हे पूल अत्यंत धोकादायक झाले आहेत.

 एमएसआरडीसीने यापूर्वी अनेकदा या पुलांवर माती भरलेले लोखंडी डब्बे व त्यावरील काठ्या उभ्या करून रिफ्लेक्टर पट्ट्या लावून तात्पुरते उपाय केले होते, मात्र सद्यस्थितीत पुलांवर संरक्षण कठडे नसल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

दरम्यान, खोपोली-वाकण मार्गाच्या रूंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामात अंबा नदीवर पाली व जांभूळपाडा येथे नवीन पुल उभारण्यात येत आहेत. या पुलांचे काम जलद गतीने पूर्ण करावे, अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply