Breaking News

अवकाळी पावसामुळे फळे, भाज्यांचे नुकसान

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

परतीच्या पावसाने कृषिमालाचे मोठे नुकसान केल्याने शेतकरी हवालदिल झाला असतानाच दोन दिवस अवकाळी पडलेल्या पावसाने हातात आलेल्या शेतमालाचेही नुकसान केले आहे. या पावसामुळे फळ आणि भाज्यांचे नुकसान होऊन त्यांची आवक पुढील महिनाभर कमीच राहणार असल्याचा अंदाज व्यापार्‍यांनी वर्तवला आहे. अवकाळी पावसाचा फटका हंगामी फळांना बसला असून त्यांचा बाजारातील हंगाम लांबणीवर जाण्याची दाट शक्यता आहे. तर, भाज्यांचेही यात नुकसान झाले असून भाज्यांची आवकही कमीच राहण्याची चिन्हे आहेत. सध्या द्राक्षे आणि स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू होत होता. बाजारात द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. दररोज द्राक्षांच्या दोन ते तीन गाड्या बाजारात येत आहेत. बाजारात द्राक्षांचा हंगाम मोठा असतो. द्राक्षांची मोठी उलाढाल होत असते. त्यामुळे खवय्यांप्रमाणे, बाजारात व्यापारीही द्राक्षांची वाट बघत असतात. मात्र हंगाम सुरू झाला असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकर्‍यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. पाणी पडल्यामुळे हाताशी आलेली द्राक्षे भिजली आहेत. त्यामुळे ती लवकर खराब होणार आहेत. त्यावर बुरशीजन्य रोग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, द्राक्षांची निर्यातही होऊ शकणार नाही. हीच परिस्थिती स्ट्रॉबेरीच्या बाबतीतही आहे. हिवाळ्यात महाबळेश्वरमधून मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीची आवक मुंबई बाजारात होते, मात्र स्ट्रॉबेरीच्या पिकालाही या पावसाचा मारा सहन करावा लागला आहे. त्यामुळे द्राक्षासह स्ट्रॉबेरीची आवकही लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचाच परिणाम फळबाजारावर होणार असून व्यापारही थंडावण्याची चिन्हे आहेत. पावसामुळे या हंगामी फळांचे मोठे नुकसान झाल्यामुळे त्यांचा हंगाम उशिरानेच सुरू होणार असल्याची माहिती व्यापारी शिवाजीराव चव्हाण यांनी दिली आहे. भाज्यांवर कीड लागण्याचा धोका भाज्यांनाही या परतीच्या पावसाचा मारा सहन करावा लागला आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पन्नावर परिणाम होणार असून अवकाळी पावसामुळे पिकांवर कीड लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी, चांगले पीक कमी होणार असून डाग आणि पाणी लागलेला भाजीपाला बाजारात येण्याची दाट शक्यता आहे. आधीच भाज्यांचे दर नेहमीपेक्षा दुप्पट-तिप्पट झाले आहेत. डिसेंबरपर्यंत ही आवक सुधारून भाज्यांची आवक वाढण्याची शक्यता होती. मात्र त्यातच या पावसाच्या हजेरीमुळे शेतीचे नुकसान होऊन चांगल्या मालाची आवक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही वाढण्याचा अंदाज व्यापार्‍यांनी वर्तवला आहे.

हापूसचे पीक धोक्यात : या अवकाळी पावसामुळे रायगड आणि कोकणातील काही भागात पावसाचा शिडकावा झाला असल्याने हापूसचे पीक धोक्यात आले आहे. आता हापूसला मोहोर येऊन त्याला फूट पडायला सुरुवात झाली होती. तर, काही ठिकाणी फूट पडून लहान लहान कैर्‍याही धरल्या होत्या. त्यावर पावसाचे पाणी पडले आहे. त्यामुळे आंब्याचेही नुकसान झाले आहे

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply