
पनवेल : रामप्रहर वृत्त
सरकारने 25 मार्च 2020 पासून टाळेबंदी जाहीर केल्यानंतर, गेटवे टर्मिनल्स इंडिया (जीटीआय) या नावाने ओळखल्या जाणार्या ‘एपीएम टर्मिनल्स मुंबई’ने आपल्या ‘टर्मिनल’वरील कर्मचारी आणि अभ्यागतांच्या सुरक्षिततेसाठी अनेक पावले उचलली आहेत. हे टर्मिनल न्हावा शेवा येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट (जेएनपीटी) येथे कार्यरत असलेल्या पाच कंटेनर टर्मिनल्सपैकी एक आहे. बंदरात प्रवेश करणारे कर्मचारी व अभ्यागत, या सर्वांचे तपमान घेणे व इतर तपासणी ‘एपीएम टर्मिनल्स मुंबई’ने अगदी प्रथमपासून सुरू केली. ‘कोविड-19’चा फैलाव होऊ नये म्हणून बंदरात वावरणार्या सर्वांना सामाजिक अंतर ठेवणे, नियमितपणे हात स्वच्छ करणे, संरक्षणात्मक मास्क घालणे आदी बंधने घालण्यात आली. खबरदारी म्हणून सर्व सार्वजनिक क्षेत्रे बंद करण्यात आली. गर्दी कमी करण्यासाठी कॅन्टीनमध्ये पॅकिंगच्या स्वरुपातील भोजन दिले गेले आणि तेथेही सामाजिक अंतराचे नियम लागू करण्यात आले. टर्मिनलवर संपूर्ण शरीर निर्जंतुकीकरणासाठी एक निर्जंतुकीकरण बोगदा व ‘शू सॅनिटायझेशन कियॉस्क’देखील स्थापित करण्यात आला. टाळेबंदीची स्थिती पाहता, बंदरात दूरवरून येणार्या वाहनचालकांसाठी ताजेतवाने होण्याची व्यवस्था करण्यात आली. सर्व प्रतिबंधात्मक आरोग्य आणि सुरक्षा तपासणीचे पालन केले जावे, या दृष्टीने जलवाहतूक खात्याचे महासंचालक, केंद्र सरकार आणि इतर वैधानिक संस्था किंवा प्रशासन यांनी प्रदान केलेल्या कठोर मार्गदर्शक सूचनांनुसार या बंदरात कार्य होत आहे. टर्मिनलवर केवळ अत्यावश्यक स्वरुपाच्या व्यावसायिक भेटींसाठी अभ्यागतांना परवानगी देण्यात आली आहे. या अभ्यागतांची स्वतःची आणि कर्मचार्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्यांची बंदरात येताना व जाताना आरोग्य तपासणी केली जाते.
RamPrahar – The Panvel Daily Paper