अलिबाग : प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेंतर्गत साकारलेली बहुप्रतिक्षित भाऊचा धक्का ते मांडवा रो रो बोटसेवा येत्या गुरुवार (दि. 20)पासून सुरू होणार आहे. या बोटीतून मुंबईतील चाकरमान्यांना स्वतःचे वाहन घेऊन रायगड जिल्ह्यात येता येणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या रो रो बोटसेवेचे 15 मार्च रोजी उद्घाटन करण्यात आले होते. कोरोनामुळे दुसर्याच दिवशी ती बंद करावी लागली होती. अखेर गौरी-गणपतीच्या सणासाठी 20 ऑगस्टपासून ही सेवा सुरू होणार आहे. सकाळी 9.15 वाजता पहिली बोट मुंबईतील भाऊचा धक्का येथून मांडवा बंदराकडे निघणार आहे. हीच बोट सायंकाळी 4 वाजता मांडवा येथून भाऊच्या धक्क्याकडे परतीचा प्रवास करेल. हे वेळापत्रक 30 ऑगस्टपर्यंत कायम राहाणार असून, त्यानंतर प्रवाशांचा ओघ पाहून बदल केला जाणार असल्याची माहिती बंदर विभागाकडून देण्यात आली. या सेवेमुळे गणेशोत्सवासाठी येणार्या अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धन तालुक्यातील चाकरमान्यांचा प्रवास सुखकारक होणार आहे.
Check Also
कोकण मराठी साहित्य परिषदेच्यासल्लागारपदी लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तकोकण मराठी साहित्य परिषदेच्या सल्लागारपदी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची नियुक्ती …
RamPrahar – The Panvel Daily Paper