नवी मुंबई ः प्रतिनिधी
मध्यरात्री कामावरून घरी चाललेल्या महिला-पुरुषाला खोट्या गुन्ह्यात अडवण्याची भीती दाखवून पैशांची मागणी करणार्या पाच पोलिसांचे निलंबन करण्यात आले. ते रबाळे पोलीस ठाण्यातील कर्मचारी असून पीडितांनी केलेल्या तक्रारीवरून चौकशीअंती त्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली.
सागर ठाकूर, स्वप्नील काशिद, श्रीकांत गोकनुर, नितीन बराडे व वैभव कुर्हाडे अशी त्यांची नावे आहेत. 6 मे रोजी रात्री ऐरोलीतील पटनी कंपनीसमोर गस्त सुरू असताना कारमध्ये एक महिला व पुरुष पोलिसांना आढळले. दोघांकडे चौकशी केली असता ते सहकर्मचारी असून घरी चालल्याचे त्यांनी सांगितले. तरीही या दोघांना कारवाईची भीती दाखवून पोलिसांनी त्यांच्याकडे तीन लाखांची मागणी केली, मात्र त्यांनी सोबत रोख रक्कम नसल्याचे सांगताच त्यांना एटीएममधून 46 हजार रुपये काढून देण्यास भाग पाडले.